काही माणसं फार सज्जन असतात. त्यांचा सज्जनपणा त्यांच्या कृतीतून, बोलण्यातून प्रतीत होतो. हा सज्जनपणा प्रकट होत असताना हा आपला, हा परका असा भेद त्यांच्या मनात उरत नाही. फूल जसं आपला सुगंध जगाला निरपेक्षपणे देतं, तसंही सज्जन माणसं आपली सेवा जगाला निःस्पृहपणे देतात आणि हळूच या जगाचा निरोप घेतात. गजानन महादेव केळकर हे असंच एक नाव. आम्ही त्यांना “बाबा’ म्हणायचो. आज ते या जगात नाहीत; पण त्यांच्या स्मृती मनात ताज्या आहेत. ते साने गुरुजी कथाकथन प्रबोधिनीचे मानद संचालक होते. ही प्रबोधिनी शिक्षकांना प्रशिक्षण द्यायची. गोष्ट कशी सांगावी, अध्यापनात गोष्टींचा वापर कसा करावा, वयोगटानुसार गोष्टी कशा निवडाव्यात असे प्रशिक्षण या शिबिरांतून दिले जायचे. अशी पाचशेच्यावर शिबिरे महाराष्ट्रभर घेतली गेली. दोन दिवसीय या शिबिरात बाबा रंगून जायचे. साने गुरुजी, महात्मा गांधी, विनोबा, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण अशा कितीतरी महापुरुषांच्या चरित्रकथा ते मुलांना सांगायचे.
बाबा एम.एस्सी. झाले होते. सहकार खात्याचे ते सचिव होते. मोठे अधिकारी असल्यामुळे त्यांना लाल दिव्याची गाडी बसायला होती. ते विचाराने समाजवादी होते. वृत्तीने निःस्पृह होते. भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणणे पाप आहे असे ते म्हणत. ते खादीचे पांढरेशुभ्र कपडे वापरत. निवृत्त झाल्यावर ते कथाकथन प्रबोधिनीचे काम करू लागले. नोकरीतल्या आठवणी सांगताना, आपल्या पांढऱ्याशुभ्र खादीच्या कपड्याकडे पाहात ते मला म्हणत, “”या पांढऱ्या कपड्यावर एकही काळा डाग पडू दिला नाही.”
त्यांनी मुलांना युद्धकथा रंगवून सांगितल्या. त्यासाठी नकाशे बनवून घेतले. युद्धकथांवरची दहा पुस्तके त्यांनी लिहिली. बोधकथाही लिहिल्या. गांधी चरित्राचा ध्यासच घेतला. गांधी चरित्राचे मर्म उलगडून दाखवले. नोकरीमुळे त्यांच्या बदल्या होत. म्हणून त्यांनी त्यांचे बिऱ्हाड पुण्यात थाटले. अनेक गावांत नोकरीनिमित्त त्यांना जावे लागले. मात्र मुले राजन आणि मोहन पुण्यातच शिकत राहिली. ते कॉलेजमध्ये शिकत असताना 1942चे “चलेजाव’ आंदोलन सुरू झाले. मग त्यांचे विचारी मन गप्प बसेना. परिस्थिती गरिबीची असतानाही त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांना दोन महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटून आल्यावर पुन्हा ते अभ्यासाला लागले. देशाप्रती असलेले आपले कर्तव्य त्यांनी त्यांच्यापरीने निभावले.
ते पुण्याच्या शनिवार पेठेतील जोशी वाड्यात भाड्याच्या खोलीत राहात. ते तीन खोल्यांचे घर होते. त्या वाड्यात इतरही काही बिऱ्हाडकरू होते. त्यात एक नाव म्हणजे रामभाऊ म्हाळगी! रामभाऊ म्हाळगींचे कुटुंब तेथे भाडेकरू म्हणून राहात. पण रामभाऊंचे समाजातील नाव मोठे म्हणून लोक त्या वाड्याला “म्हाळगी वाडा’ असं म्हणू लागले. रामभाऊंचा जयंता आणि केळकर बाबांचा मोहन मित्र होते. तशी वाड्यातील सारीच मुले एकमेकांचे मित्र होते. फक्त वयात कमी-जास्त अंतर होते. ही मुले वाड्याच्या मधल्या चौकात क्रिकेट खेळत. मोठा गोंधळ करत. पण आपलीच मुले म्हणून कोणी तक्रार करीत नसे.
बघता बघता ही मुले मोठी झाली. जयंत म्हाळगी आणि मोहन केळकर समवयस्क असल्यामुळे एकाच इयत्तेत शिकत होती. दोघेही मॅट्रिक पास झाली. त्यावेळी अकरावीला मॅट्रिक म्हणत. पुढे जयंत कलाशाखेकडे वळला. मोहन इंजिनिअरिंगला गेला. तो केमिकल इंजिनिअर झाला. मोहनला पुढे शिकायचे होते. त्याला अमेरिकेला जाऊन एम. एस. करायचे होते. उच्च पदवी प्राप्त करायची होती. जयंताच्या घरच्या लोकांनी मात्र जयंताला दोन वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी ईशान्य भारतात पाठवायचे ठरवले. तिथल्या गरीब, आदिवासी लोकांची सेवा करण्याचे जयंतने ठरवले. त्या आदिवासींचे शिक्षण, आरोग्य, इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे जयंताने निश्चित केले.
एकेदिवशी या दोन मित्रांना निरोप देण्यासाठी जोशी वाड्यातल्या मधल्या चौकात सभा भरली. बाबा केळकर अध्यक्षस्थानी होते. वाड्यातील लोकांनी भाषण करताना दोघांचेही कौतुक केले. शेवटी बाबा बोलले. ते म्हणाले, “मोहन केळकर अमेरिकेला जात आहे. तो उच्चशिक्षण घेणार आहे. तो जरी माझा मुलगा असला तरी मला स्पष्ट सांगितले पाहिजे की, तो त्याच्या सुखासाठी जात आहे. पैसे मिळविण्यासाठी जात आहे. भौतिक सुखासाठी जात आहे. आणि जयंता (म्हाळगी) मात्र देशाच्या कामासाठी जात आहे. जयंता देशसेवेसाठी जात आहे.’
बाबांचे निःस्पृह बोलणे लोकांना भावले. मोहन आणि जयंताच्या भविष्यातील दिशांचे अचूक मूल्यमापन बाबांनी केले; तेही स्पष्टपणे आणि तटस्थपणे, हाच बाबा केळकरांचा मोठेपणा होता आणि मनाचा चांगुलपणा. असं चांगुलपण आता विरळ होत चाललं आहे.
डॉ. दिलीप गरूड