“एचआर मीट’मध्ये टाटा ट्रस्टचे सल्लागार श्रीनिवास यांचे मार्गदर्शन
पुणे – उत्तम काम करण्यासाठी आम्ही नेहमी नैतिक मूल्ये, मेहनतीची तयारी, शिस्त, सन्माननीय वागणूक, उत्साह अशा गोष्टी असणाऱ्या उत्तम कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते, असे मत टाटा ट्रस्टचे सल्लागार एच. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) यांच्या विद्यमाने डेक्कन जिमखाना येथे “एच आर मीट’ आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एआयएसएसएमचे सहसचिव सुरेश शिंदे, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य निखिल खनसे, राहुल यादव, एनआयपीएमचे अध्यक्ष उमेश जोशी, एनआयबीएमचे सरचिटणीस व नेक्सन व्हील्सचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक मानव एच आर मॅनेजर उपस्थित होते.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील कर्मचाऱ्यांना, पेन्शन योजना, मुलांसाठी शैक्षणिक योजना, वैद्यकीय सुविधा, कर्जविषयक योजना अशा अनेक सवलती ट्रस्टमार्फत देण्यात आल्या आहेत. ट्रस्टने मुंबईतील स्थानिक लोकांना मदत केली. पुनर्वसन केंद्र, मदत निधी तयार करण्यासाठी विविध योजना तयार करून येणारा अडथळा दूर केला. तज्ज्ञ समिती, योग शिक्षक, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, छोट्या रकमेची कर्जे, नोकऱ्या, व्यवसायासाठी रिक्षा किंवा टॅक्सीची खरेदी करण्यास मदत करणे अशी अनेक कामे करण्यात आली आहेत, असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. सोनाली जाधव यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. मोनिका राव यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.अश्विनी माडगूळकर यांनी मानले.