अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणाले होते की, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असे नाही, तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. या धर्तीवरच नव्या भारताच्या उभारणीसाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या दिशेने देश पुढे जात आहे. रस्तेबांधणीच्या वेगाच्या बाबतीत नवनवीन उच्चांक नोंदविण्यात येत आहेत.
भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात रस्ते वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते. कोणत्याही देशाची प्रगती तेथील रस्ते पाहूनच ठरविली जाते. देशाची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी रस्त्यांचे जाळे अत्यंत महत्त्वाचे आहे. महामार्गाच्या निर्मितीनेच लोकांचा संपर्क वाढतो. रस्त्यांद्वारेच कच्चा माल कारखान्यांपर्यंत पोहोचतो आणि कारखान्यांतील उत्पादने लोकांपर्यंत पोहोचतात. कोणत्याही देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा तसेच त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे होणारी वाहतूक यावर देशाचा विकासदर अवलंबून असतो. त्यामुळे देशाच्या जलद विकासासाठी कार्यक्षम वाहतूक महत्त्वाची ठऱते.
सुवर्ण चतुर्भुज महामार्ग हा प्रकल्प माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला होता. कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या महानगरांना जोडणारा सहा लेनचा हा प्रमुख महामार्ग प्रकल्प आहे. उत्तर दक्षिण कॉरिडॉर श्रीनगर आणि कन्याकुमारीला जोडतो. पूर्व पश्चिम कॉरिडॉर सिलचर आणि पोरबंदरला जोडतो. भारतातील प्रमुख शहरांमधील अंतर कमी करणे हा या सुपर हायवे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. आज भारतातील रस्त्यांचे जाळे जगात सर्वांत जास्त लांबीचे आहे. आजमितीस गावे शहरांशी रस्त्यांद्वारे जोडलेली आहेत. महामार्ग हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा बले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 2024 पर्यंत भारतात अमेरिकेसारखी पायाभूत संरचना उपस्थित असेल. देशात सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांना जोडणारे 26 हरित महामार्ग बांधले जात आहेत. हे महामार्ग दिल्ली, जयपूर, चंदिगड, अमृतसर, मुंबई, कटरा, श्रीनगर आणि वाराणसी तसेच इतर शहरांना कोलकात्याशी जोडतील. या महामार्गांच्या निर्मितीमुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
देशात रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता नाही. देशातील रस्ते वाहतूक व्यवस्था सुधारण्यास केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. आज लांबचा प्रवास खूप सोपा झाला आहे. आज काही तासांत सुरळीतपणे प्रवास करणे शक्य झाले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपले जीवन अतिशय सुरळीत आणि सोपे केले आहे. सर्वांत मोठी कमाई म्हणजे कोविडमुळे लॉकडाउन लावण्यात आला होता, त्या काळात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली. 2020-21 मध्ये महामार्ग बांधणीचा प्रतिदिन वेग 36.5 किलोमीटर एवढा होता. राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या कामाचा आतापर्यंतचा हा सर्वांत अधिक वेग आहे. भारताने अवघ्या 24 तासांत 2.5 किलोमीटर चारपदरी कॉंक्रिटचा रस्ता आणि 26 किलोमीटर एकपदरी रस्ता अवघ्या 21 तासांत बांधून जागतिक विक्रमही केला आहे.
यापूर्वी रस्तेबांधणी क्षेत्रात आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही नोंदविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका कंत्राटदाराने 25.54 किलोमीटर लांबीचा एकपदरी रस्ता 18 तासांत बांधला होता. हा रस्ता सोलापूर-विजापूरदरम्यानच्या चारपदरी रस्त्याचा भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी 2022-23 मध्ये 18 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम 50 किलोमीटर प्रतिदिन या विक्रमी वेगाने सुरू आहे. 2025 पर्यंत दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा कालबद्ध आणि ध्येयाभिमुख बनविण्यावर भर दिला जात आहे. कारण रस्ते आणि पायाभूत सुविधा ही स्वावलंबी भारताची आशा आहे. आता रस्ते आणि महामार्ग बांधणीसाठी जागतिक दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात परवडणारे, टिकाऊ आणि पुनर्वापर करण्यायोग्य तंत्रज्ञान वापरले जात आहे. ईशान्येकडील प्रदेश, डोंगराळ राज्ये आणि इतर मागासलेल्या प्रदेशांमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महामार्ग बांधण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
महामार्गांव्यतिरिक्त विस्तीर्ण रेल्वेमार्ग नेटवर्कने ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या आठ वर्षांत सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. उत्तम वाहतूक आणि आर्थिक समृद्धीसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस रोड कॉरिडॉरच्या बांधकामाच्या दिशेने वेगाने प्रगती केली जाते आहे. देशाच्या सीमावर्ती भागांत चांगले रस्ते कधीच नव्हते. सीमेवर असलेल्या रस्त्यांच्या बांधकामाची जबाबदारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची आहे. आता सीमावर्ती भागात व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधले जात आहेत, जेणेकरून सीमेवर निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कराची उपकरणे तातडीने सीमेवर तैनात लष्कराकडे पोहोचविता येतील. लढाऊ विमानेही उतरू शकतील आणि उड्डाण करू शकतील अशा पद्धतीने महामार्ग बांधण्यात आले आहेत.
मात्र, दुर्दैवाचा भाग असा की, शहरे आणि महानगरांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महानगरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार रस्त्यांचा वापर वाढल्यामुळे रस्ते खराब होतात. थोड्याशा पावसामुळे रस्ते वाहून जातात. याकडे राज्य सरकारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्ष द्यावे लागेल. रस्त्यांवरील खड्डे आपल्या शहरांच्या दुर्दशेची कहाणी सांगताना दिसतात. अमेरिकेच्या धर्तीवरच नव्या भारताच्या उभारणीसाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या दिशेने देश पुढे जात आहे.