नवी दिल्ली : संपूर्ण जगात करोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच या करोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. लसीशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वात आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना करोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच लागण झाली तरी रुग्ण गंभीर होत नाही.
दरम्यान, भारतात लस घेतलेल्या एकूण २.६ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. तसेच एक डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत दोन डोस घेतलेल्या लोकांना करोना झाल्याची संख्या कमी आहे, अशी माहिती सरकारी एजन्सींनी गोळा केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. ही आकडेवारी लसीकरण सुरू झाल्यापासून ते ३ ऑगस्टपर्यंतची आहे.
लसीचा एक डोस घेतलेल्या १.७१ लाख लोकांना करोना झाला. तर, दोन डोस घेतलेल्या ८७ हजार ४९ लोकांना संसर्ग झाला. दोन डोस घेतलेले लोक हे लसीचा एक डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहेत, असे या आकडेवातून दिसून येत आहे. देशभरात आतापर्यंत 53.61 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात लसीकरणानंतर झालेल्या ज्या लोकांना संसर्ग झाला, त्यांची माहिती गोळा करत आहे. पुढच्या आठवडाभरात यासाठी एक ट्रॅकिंग पोर्टल सुरू केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र हे पोर्टल लोकांसाठी खुले असेल की नाही याबाबत स्पष्टता नाही. तसेच विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची पुष्टी करण्यासाठी विविध राज्यांमधून जीनोम सिक्वेंसिंग केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.