नागपूर – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या पोलीस भरतीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मोठी घोषणा केली. पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती घेणार असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात 12 हजार 538 जागा भरण्याचा मोकळा झाला आहे.
पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असहीे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असही देशमुख म्हणाले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून एसीबीसीच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.