मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी एक महत्वाची बातमी आहे. एमपीएससी ची परीक्षा देण्यासाठी आता कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची अट रद्द करण्यात आली असून आधी केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षार्थींना कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. याबाबतची घोषणा आज दि १६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली असून याबाबतचे अधिकृत ट्विटही करण्यात आले आहे.
आता विविध प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससी परीक्षांप्रमाणे एमपीएससीकडूनही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
अशी होती परीक्षा देण्याची मर्यादा
१)खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी
२)इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी
३)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती.
मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थीं कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात.