नवी दिल्ली : देशात एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ या संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके 10 दिवस अगोदरच कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी आहे. दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात.
हवामान विभागाने अंदाज जाहीर केल्यानंतर आता युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट या संस्थेने दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचे म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो.