मुंबई : राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिलासादायक माहिती दिली. राज्यात तिसऱ्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत असला तरी एक आधार देणारी गोष्ट आहे ती म्हणजे राज्यात अजूनही ९० ते ९५ टक्के बेड हे रिकामे राहिले आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ब्रिटन आणि फ्रान्स या देशांपासून टास्क फोर्स आणि केंद्र शासनानं बोध घ्यावा आणि निर्बंध शिथील करण्याबाबत भूमिका घ्यावी, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच, ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव वाढतोय, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.
“ज्या अर्थी ब्रिटन आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी संसदेत भाषण करुन सांगितले की, आता आपल्याला करोनासोबत राहायचं आहे. देशांनी कोरोना बरोबर रहाण्याची मानसिकता करून तेथील निर्बंध शिथील करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे या देशांपासून बोध टास्क फोर्स आणि केंद्र शासनानं घ्यावा”, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच केंद्राच्या भूमिकेची महाराष्ट्र सरकार वाट बघत असल्याच देखील टोपे टोपे यांनी म्हटलंय. तसेच, ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करत टोपे यांनी लस घेण्याची पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना विनंती केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेतसुद्धा सध्या दवाखान्यात 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे आहेत. तसेच, दवाखान्यात भरती होण्याचं प्रमाण केवळ 5 ते 7 टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ही बाब समाधानकारक आणि राज्याला आधार देणारी असल्याचे देखील टोपे म्हणाले.