मुंबई – एसटी कर्मचाऱ्यंसाठी दिलासादायक बातमी आहे. थकित वेतन देण्यासाठी महामंडळानं 2 हजार कोटींचं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
लाॅकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकले आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देणं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
प्रवाशांनाही दिलासा-
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवेळी दिवाळीच्या दिवसांत केली जाणारी हंगामी दरवाढ यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूनीवर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचलित तिकीट दरानुसारच प्रवाशांना दिवाळीच्या दिवसांत प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी एस.टी. कामगार संघटना प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळावे यादृष्टीने परविहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले होते.