नवी दिल्ली – कोविड-19 ची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेऊन उद्या (17 नोव्हेंबर) पासून श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरमधील व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. कोविड-19 च्या साथीमुळे 16 मार्च 2020 पासून या कॉरिडॉरमधील सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात शीख यात्रेकरूंना फायदा होणार आहे.
भारताने 24 ऑक्टोबर 2019 रोजी डेरा बाबा नानक, आंतरराष्ट्रीय सीमेवरील झिरो पॉइंट येथे श्री करतारपूर साहिब कॉरिडॉर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियांसंदर्भात पाकिस्तानसोबत करार केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 22 नोव्हेंबर 2018 रोजी श्री गुरू नानक देवजींच्या 550 व्या जयंती दिनाचा ऐतिहासिक सोहळा देशभरात आणि जगभरात भव्य पद्धतीने साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता. एका ऐतिहासिक निर्णयांतर्गत, केंद्रीय मंत्रिमंडळाने डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरची इमारत आणि विकासाला देखील मंजुरी दिली होती, ज्यामुळे भारतातील यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला वर्षभर सहजतेने आणि विनासायास भेट देता येणे शक्य होते.