मुंबई – राज्यात महाविकास सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. निवडणुकीत भाजपसोबत लढलेल्या शिवसेनेने कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील कर्जमाफीचं वचन दिलं होतं. त्यानुसार महाविकास आघाडीने कर्जमाफी केली. मात्र यातून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी मदतीची घोषणा झाली होती. आज सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे.
शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र नंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत करणे सरकारला शक्य झाले नव्हते. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रोत्साहनपर अनुदानावरून सरकारवर टीका केली होती.
दरम्यान उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत मदत देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. या मदतीची घोषणा आधीच झाली होती. आता पुढील काही दिवसांत याची अंमलबजावणी होणार आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. तसेच अंतरिम पीककर्जही शून्यटक्के व्याजदराने मिळणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.