मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात हैदोस घातल्यानंतर आता पावसाने रविवारी निरोप घेतला आहे. याविषयीची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून पाऊस परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे.
मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे.
मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही. राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्याने गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यंदा अनुभवला. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा देखील विक्रम मोडून मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. तसेच संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.