मुंबई – राज्यातील सर्व मंदिरे येत्या ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्यानंतर राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता दुसऱ्या लाटेचा दाह ओसरू लागला असून नव्या बाधितांची संख्या देखील घटल्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावीत यासाठी भाजपने आंदोलन छेडले होते. मनसे देखील या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरली होती. मात्र या दोन्ही पक्षांनी मंदिरे उघडण्याबाबत दिलेली अल्टिमेटम ठाकरे सरकारने धुडकावून लावले होते.
राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत ठाकरे सरकारने हात आखडता घेतला होता. मात्र गणपती विसर्जनानंतर देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत नसल्याचं दिसत असल्याने ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
तत्पूर्वी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. पुण्यातील करोना आढावा बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आणखी काही निर्बंध शिथिल करण्याबाबतचे संकेत दिले.