नवी दिल्ली – मागील दीड वर्षापासून देशात असलेला करोना संकट, त्यात लॉकडाऊन आणि वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक हातबल झाले आहेत. मात्र या महागाईत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्क्यांनी वाढ केली केली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के महागाई भत्ता मिळतो, यात वाढ करून तो आता 28 टक्के करण्यात आल्याची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
करोना महामारीमुळे मागील वर्षी 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. आता मात्र कर्मचाऱ्यांना घसघशीत वाढ मिळाली आहे. मात्र वाढीमुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भार पडणार आहे.