बिदाल – सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना “अच्छे दिन’ आले आहेत. मात्र, कांद्याच्या दरांनी अनेक वर्षांचा उच्चांक गाठल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत असून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी येत आहे. हॉटेल व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. सध्या कांद्याचा किरकोळ विक्री दर प्रतिकिलो 100 ते 150 रुपयांपर्यंत गेला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळणे आवश्यक असताना त्याकडे माण बाजार समितीच्या संचालकांचे दुर्लक्ष होत आहे. माण तालुक्यात कांदाची व डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने राज्य सरकारने तालुक्यात मोठी बाजारपेठ व संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
गेल्या तीन महिन्यात अतिवृष्टी, परतीचा पाऊस, त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान, धुके अशा एका पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक संकटांचा फटका माण तालुक्यातील कांदा उत्पादनाला बसला. उत्पादन घटल्याने बाजारपेठेतील आवकही घटली असून कांद्याचे भाव दिवसेंदिवस वधारत आहेत. त्यामुळे मिळणारा वाढता दर लक्षात घेऊन बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी आपल्याजवळचा कांदा विकून रिकामे झाले आहेत. गेल्या महिनाभरात व्यापाऱ्यांनी आपली गोदामे भरून ठेवली आहेत. नव्याने उत्पादित होणारा कांदाही नुकसानीत आला आहे. घाऊक बाजारात 90 ते 140 रुपये प्रतिकिलो भावाने सौदा होत आहे तर किरकोळ बाजारात 100 ते 150 रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे कांदा कापल्यानंतर गृहिणींच्या डोळ्यात येणारे पाणी आता भाव ऐकूनच येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
खवय्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. ग्राहकांना जेवताना मुबलक कांदा पुरविला जायचा; पण अफाट दरवाढीमुळे अनेक हॉटेलमध्ये “कांदा मिळणार नाही’ असे फलक झळकत आहेत. अनेक हॉटेलांमधील कांदाभजी एक तर गायब झाली आहे किंवा त्यांचा आकार कमी झाला आहे. काही हॉटेलांमध्ये कोबी घातला जात आहे किंवा बटाटाभजी विकली जात आहेत. सध्या बाजारपेठेत फक्त साठवणीतला कांदा येत असल्याने आगामी दोन महिने हे दर वाढतच राहतील, अशी शक्यता आहे.