चांगल्या गोष्टी:
मे महिन्यापासून वाढीचा आलेख घसरणार
येत्या 3- तारखेपासून देशभरात करोना रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याचे व त्यामुळे मे महिन्याची सुरुवात दिलासादायक असण्याची शक्यता करोनासंदर्भातील टास्क फोर्सचे सदस्य व्हि. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंतच्या आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांनी भविष्यातील स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. 30 एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली असेल. त्यानंतर मात्र यात घसरण सुरू होईल.
दक्षिणेकडील राज्यांना मिळणार दिलासा
गेल्या एक महिन्याचा विचार केला तर दक्षिण भारतातील राज्यांतील करोना प्रसाराचा वेग मंदावला आहे. तामिळनाडूत 24 मार्च रोजी रुग्णांच्या वाढीचा अर्थात करोनाच्या पादुर्भावाचा वेग 47.2 टक्के होता. जो 23 एप्रिल रोजी 4. 1 टक्क्यापर्यंत घसरला आहे. कर्नाटकात महिनाभरापूर्वी वाढीचा वेग 18.9 तर केरळमध्ये 20.3 टक्के होता. जो आता 23 एप्रिल रोजी अनुक्रमे 3.4 आणि 1.8 टक्के झाला आहे.
14 दिवसांत 80 जिल्ह्यांत एकही रुग्ण नाही
देशभरातील असे 80 जिल्हे आहेत की जेथे गेल्या चौदा दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. नवे जे रुग्ण सापडत आहेत, ते प्रामुख्याने हॉयस्पॉट भागातीलच आहेत.
11 राज्यांतील चित्र समाधानकारक
लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि जागरूकता यांचे चांगले परिणाम आता समोर येत आहेत. देशातील गोवा, अरुणाचल आणि मणिपूर ही राज्ये पूर्णत: करोनामुक्त झाली असून 11 राज्यांतील करोना लागण झालेल्यांची संख्या 50 टक्के अथवा त्यापेक्षाही कमी झाली आहे. केरळमधील 450 रुग्णांपैकी 331 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. लडाखमधील 20 पैकी 14 तर, उत्तराखंडमधील 48 पैकी 25 रुग्ण बरे झाले आहेत. याचाच अर्थ रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अत्यंत दिलासा देणारे आहे.
काळजी वाढविणाऱ्या बाबी:
भारतात प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त
करोनामुळे सगळ्यांत जास्त प्रभावित झालेल्या देशांत एक महिन्याच्या लॉकडाउननंतरही प्रादुर्भावाचे प्रमाण भारतात सगळ्यांत जास्त आहे. 24 मार्च रोजी अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांत प्रतिदिन रुग्ण वाढीची संख्या भारतापेक्षा जास्त होती. आता लॉकडाऊनच्या एक महिन्यानंतर भारतातील रुग्णवाढीचा दर 21 टक्क्यांवरून 8 टक्के इतका घसरला असला तरी अन्य प्रभावित देशांतील हा दर मात्र 4 टक्क्यांपेक्षाही खाली आला आहे.
अहमदाबाद, सुरत, चेन्नई धोकादायक
अहमदाबाद, हैदराबाद, सुरत, चेन्नई या शहरांत नवे हॉटस्पॉट आढळून येत असून ती धोक्याची व काळजी वाढवणारी बाब आहे. अहमदाबादेत तर केवळ चारच दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. लॉकडाउनच्या निकषांचे योग्य पालन केले जातेय का, याची तपासणी करण्यासाठी आता येथे पथके पाठवली जाणार आहेत. वाढीचा हा वेग असाच राहीला तर मे महिन्यातच येथे रुग्णांची संख्या आठ लाखांचा टप्पा गाठेल.
संक्रमणाचा वेग कमी झाला असला तरी अद्याप तो जास्तच आहे. हाच वेग कायम राहिला तर एका आठवड्यात रुग्णांची संख्या 40 हजारांवर जाउन पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 8 टक्के वाढीचा हा वेग असाच राहिला तर मे महिना अखेरपर्यंत देशातील रुग्णांची संख्या चार लाखाचा आकडा ओलांडेल.
गुरुवारी देशभरात एकाच दिवसांत 1755 नवे रुग्ण आढळून आले होते. हा आतापर्यंतच सगळ्यांत जास्त आकडा आहे. त्यात शुक्रवारी आणखी नव्या 1433 रुग्णांची भर पडली. तसेच शुक्रवारी दिवभरात 54 जणांचा मृत्यू झाला. हाही एकाच दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा सगळ्यांत मोठा आकडा आहे.