रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019. चालू वर्षाचा शेवटचा रविवार. पुढील रविवार येईल तो टी-20 म्हणजे सन 2020चा. चालू वर्ष म्हणजे सन 2019 संपायला दोनच दिवस राहिले आहेत. या दोन दिवसात कितीतरी कामे करायची आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प करायचे आहेत. ते दरवर्षी सर्वच जण करतात. प्रत्यक्षात किती येतात हा एक सशोधनाचा विषय असतो, हा भाग वेगळा. दुर्लक्ष करण्यासारखा. मात्र एक आहे, झाले ते वर्ष गेले, आता नवीन वर्ष तरी चांगले सुखासमाधानाचे भरभराटीचे जाऊ दे अशी सर्वांची मनापासून इच्छा असते. स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठीही. साऱ्या जगभर हेच चाललेले असते.
31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्याचा, नवीन वर्षाच्या स्वागताचा दिवस. तसा मोठ्या जल्लोशाचा दिवस. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता जगभरात नववर्षाचे जंगी स्वागत होते दरवर्षी. मला आठवते तेव्हापासून नवीन वर्षाच्या स्वागताचा समारंभ असाच उत्साहाने होत आला आहे. प्रत्येक नवीन वर्षामागे आपलेही वय वाढत असते, आपणही एका वर्षाने मोठे होत असतो हा विचार मात्र कोणीही करत नाही. अपवाद फक्त ज्यांचा वाढदिवस 31 डिसेंबरला असतो, त्यांचाच. त्यांच्यासाठी मात्र हा टू-इन-वन कार्यक्रम असतो.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेलेल्या वर्षातील घडामोडींचे परीक्षण होते. सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके त्याचा लेखाजोखा मांडतात. रेडिओ-टीव्हीवाले महत्त्वाच्या घडामोडी दाखवतात, त्यावर टीकाटिप्पणी करतात. मोठा अभ्यासपूर्ण कार्यक्रम असतो तो. या साऱ्यात गेल्या वर्षाचे यशापयश मोजले जाते… महत्त्वाच्या घटनांचे पुनरावलोकन केले जाते. टीव्हीच्या शेकडो चॅनल्सवर नववर्षाची संध्या रंगीबेरंगी होऊन जाते. काय पाहावे आणि काय पाहू नये असे होऊन जाते या चॅनल्सच्या भाऊगर्दीत. आणि चॅनल सर्फिंग करता करता बरेच काही पाहायचे राहून गेल्याची हुरहुर लागून राहते आणि जे बघितले त्याचा आनंद विरून जातो. या चॅनल्सच्या पाहण्यात मला नेहमी ती, सिकंदराची-जगज्जेत्या सिकंदराची गोष्ट आठवते.
जिंकायला काही राहिले नाही म्हणून सिकंदर ढसढसा रडला होता म्हणे. खरे की खोटे देव जाणे. पण ऐकायला-वाचायला मोठे चमत्कारिक वाटते. की एवढा मोठा पराक्रमी सिकंदर जिंकायला काही उरले नाही म्हणून रडला होता. पण यात त्याचे अज्ञानच दिसत नाही का? एक तर त्याने सारे जग पाहिलेच नसावे, मग जिंकायची गोष्ट दूरच. आणि जे काही त्याने जिंकले होते, ते तरी त्याच्याकडे कोठे राहिले.
तो आला, त्याने जिंकले आणि तो परत फिरताच सारे गमावले अशी स्थिती असावी. त्याच्या हयातीतच त्याने जिंकलेला बराचसा भाग त्याच्या ताब्यातून सुटला असावा. त्याच्याच अधिकाऱ्यांनी त्याचे स्वामित्व झुगारले असावे, मग जिंकण्याचा क्षणिक अभिमान कशाला? पण एक निश्चितच घडले असावे की, त्याला आपल्या मर्यादांची कठोर जाणीव झाली असावी, लोक किंवा आपण स्वत:ही स्वत:ला जितके मोठे समजतो तसे आपण नाही या जाणिवेने तो रडला असावा. आणि ती जाणीव प्रत्येकालाच होत असते. आणि त्या जाणिवेने उघडपणे रडला नाही, तर मनातल्या मनात प्रत्येकजणच अश्रू ढाळत असावा. कारण दर वर्षी वर्ष संपता संपता माणूस थोडासा थांबतो, थांबून गेलेल्या वर्षाकडे मागे वळून पाहतो. या मागे वळून पाहण्यात आपल्या एक प्रकारे आयुष्याचे सिंहावलोकन करणेच असते. आपण आपल्या यशापयशाचे मोजमाप करतो. या दरम्यान काहींच्या आयुष्यात एक
आकस्मिक परिवर्तन झालेले दिसते. त्यामागे हाच विचार असावा. एकेक वर्ष म्हणता केवढे तरी आयुष्य उलटून गेलेले असते. हाती काय आले आहे याचा विचार मनाला पोखरत असतो. मागील वर्षाच्या सुरुवातीच्या काळातील प्लॅनिंग, निर्धार, संकल्प यातून काय साध्य झाले याचा आढावा घेतो. त्यात कधी काहीशी विफलता जन्माला येते. पण ती तात्पुरती असते.
नववर्षाच्या संध्येला आपण पुन्हा एकदा नवीन उत्साहाने, नव्या उभारीने, नव्या संकल्पासह नव वर्षाचे स्वागत करतो आणि ते करतच राहिले पाहिजे. त्यातच जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे.
अश्विनी महामुनी