नागठाणे – आमदार असताना फक्त विकासाच्या नावाखाली भूलथापा मारणारे आता निवडणूक आल्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या विकासकामाचे नारळ फोडत आहे, असा खरमरीत टीका मनोज घोरपडे यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. दरम्यान, कराड उत्तरच्या जनतेने भुलथापा मारणाऱ्यांना चांगलेच ओळखले असल्याने परिवर्तन अटळ असून केवळ आता औपचारिकता बाकी राहिली असल्याचेही मनोज घोरपडे यांनी बोलून दाखविले. चरेगाव (ता. कराड) येथील कोपरा सभेत ते बोलत होते.
कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे याच्या प्रचारार्थ चरेगाव, शीतलवाडी, खालकरवाडी, इंदोली, चोरे, धावरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, साखरवाडी, साबळेवाडी, आंधारवाडी, कोरिवळे या गावात काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रत्येक गावातील नागरिकांनी अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचे उस्फूर्तपणे स्वागत करत दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे व्यक्त होत पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या पदयात्रेत युवावर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
मनोज घोरपडे म्हणाले, मतदार संघातील गावागावात मी पाच वर्षांपासून कार्यरत आहे, आज प्रत्येक गावातील सर्वसामान्य लोकांपर्यत माझा संपर्क आहे, या विभागातील अनेक विकासकामे व शासकीय योजना शासनाच्या माध्यमातून मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उभा असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने लोक पाठिंबा देत आहेत. या विभागातील रस्ते व पाणी तसेच इतर विकास कामाच्या बाबतीत पाहिले तर विकास फक्त कागदावरच झालेला आहे.
प्रत्येक गावात एक पुढारी तयार करायचा व गावातील सर्वसामान्य जनतेला गृहीत धरायचे हे त्यांचे उद्योग आता सर्वसामान्य लोकांनी ओळखले असून त्यांना घरी बसवण्यासाठी जनताच उत्सुक आहे, त्यामुळे सर्वांनी मोठ्या ताकतीने परिवर्तन घडवूया, असे आवाहन मनोज घोरपडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी हणमंतराव माने, अमृत सुर्यवंशी, आशितोष माने, ओंकार कुलकर्णी, बाबुराव माने, निळकंठ देशमाने, सुजय तोडकर, बबनराव रसाळ, रणजित माने, आकाश रसाळ, महादेव सुर्यवंशी, विश्वनाथ बल्लाळ, मंदार तांडेकर, राजेंद्र अवघडे, अशोक माने यांच्या विभागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडून आल्यावर माझा पहिला अग्रकम कराड उत्तरेतील प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करण्यावर राहील त्यामध्ये गावातील रस्ते, शैक्षणिक सुविधा, 24 तास पाणी पुरवठा योजना,आरोग्य सुविधा व इतर मुलभूत सुविधांचा आराखडा तयार करून कराड उत्तरेला राज्यात विकासाचे मॉंडेल म्हणून बघितले जाईल.