– शर्मिला जगताप
पतितोद्धार ही एक आपली सनातन सामाजिक समस्या आहे. हिंदी चित्रपटांपुरती तर ती एक सामाजिक, सनातन एवढीच नसून सोयीस्कर समस्याही आहे. नर्तकीची समस्या मांडायची, त्या निमित्ताने भरपूर नाचगाणी रंगढंग…
“परिवर्तन’ने देखील याच समस्येचा जुना काळात शोध घेतला आहे आणि तो शोध घेताना पारंपरिक हिंदी चित्रपटापासून थोडे वेगळे राहण्याचा “परिवर्तन’ने प्रयत्न केला आहे. मुख्य म्हणजे, देहविक्रयाची परंपरा किंवा खरे तर दुष्टचक्र, आधुनिक समाजजीवनातही कसे मिसळून गेले आहे यावर “परिवर्तन’ने बोट ठेवले आहे. “परिवर्तन’च्या दोन्ही नायिका मजबुरीने या मलीन वाटेवरून चाललेल्या आहेत; पण नाचणे, गाणे हा त्यांचा पेशा नाही. घरच्या गरिबीवर पांघरुण घालण्यासाठी आशाला (मनीषा) नोकरी टिकवणे भाग असते आणि ती टिकवण्यासाठी बॉसला खूशही करणे भाग असते.
हळूहळू आशाची भीड मरते आणि हा भरपूर पैसा मिळवून देणारा “साइड बिझिनेस’ मग पूर्ण वेळाची नोकरी ठरते! स्वतः आशा आणि तिची आई पैशाच्या उबेमुळे या नव्या आयुष्याला सरावून जातात. डी. एस. सुलतानियांच्या दिग्दर्शनात आपल्याला आवडून जातो तो हा वास्तव दृष्टिकोन, नायिका व तिची आई मग पावित्र्याच्या परिस्थितीमुळे मजबूर असल्याच्या आणि परिस्थितीबद्दल समाजाला जबाबदार धरण्याच्या गप्पा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी करीत नाहीत!
फार काय, एका पांढरपेक्षा वस्तीतच त्या सरळपणे, सहजपणे राहू शकतात. हे सत्यही दाखवून दिग्दर्शकाने आधुनिक समाजात ह्या विषाची पाळेमुळे किती आतवर, किती खोलवर पसरली आहेत ते प्रत्यक्षपणे सांगितले आहे. या वासनेच्या दुष्टचक्राचे घातक पर्यवसान आशाच्या व तिच्या मैत्रिणीच्या हत्येत होते. एका नरपशूच्या लालसेला पुरे पडताना मैत्रिणीचा खून होतो आणि ही वार्ता पोलिसांना कळवली म्हणून आशाचे तोंड कायमचे बंद करण्यात येते.
आशाच्या मृत्यूनंतर खरे म्हणजे तिचे काय होते हे कुणालाच कळत नाही, तेव्हा बेपत्ता झाल्यानंतर म्हणू या, तिची धाकटी बहीण लता (हीना कौसर) तिचे कार्य (!) पुढे चालवते. लताच्या सुदैवाने सुनीलसारख्या (रणजीत मलिक) होतकरू तरुणाशी तिची गाठ पडते. तिचा भूतकाळ काय आहे याबद्दल फिकीर न करता तो तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. मात्र प्रत्यक्षात तिचा काळा भूतकाळ समोर ठाकतो, तेव्हा ही आदर्शवादी स्वारी गडबडते.
तशातच त्याच्या एका दोस्ताने टिपलेले लताचे निरनिराळ्या अवस्थांमधल्या रंगीत तसबिरी त्याच्या हातात लागतात. या ठिणगीने पती-पत्नीचा संघर्ष पेट घेतो. दोघेही बंदुकीच्या गोळीचे लक्ष्य बनू पाहतात. अर्थात, प्रत्यक्षात तसे घडत नाही. दरम्यान, आशाची कशारीतीने निर्घृण हत्या होते हेही उघडकीला येते. रणजीतमधला विचारी पुरुष जागा होतो आणि आता भूतकाळाची भिंत पार कोसळून तो लताला पुन्हा आपल्या जीवनात स्थान देतो.
खास बंगाली वळणाचा हा पाच-सहा दशकांपूर्वीचा चित्रपट. पण आजही मजबुरीत सापडलेल्या तरुणींची “आशा’ होते, ही आजही वस्तुस्थिती आहे. मजबुरीतही आपला स्वाभिमान जागा ठेवून प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिल्यास अशा “आशा’ निर्माणच होणार नाहीत.