शर्मिला जगताप
तमाशाशिवाय मराठी चित्रपट चालत नव्हता, असा एक काळ होता. तेव्हा मराठी चित्रपट म्हटल्यावर त्यामध्ये तमाशा हा हवाच! तमाशा असला व कथा वगैरे बाकीच्या बाजू जरी नसल्या तरी चित्रपट बरा चालतो. तेव्हा तमाशाप्रधान चित्रपट तयार करणे ही मराठी चित्रपट निर्मात्यांची चाकोरी बनून गेली होती.
“पटलं तर व्हय म्हणा’ हा फारसा कुणाच्या लक्षात न राहिलेला पाच-सहा दशकांपूर्वीचा चित्रपटही त्याच प्रकारातला आहे. या चित्रपटात एका तमासगीर मंडळीच्या जीवनात घडणारे नाट्य चित्रित केले आहे. तमासगीर मंडळी म्हटल्यावर त्यांचा मुक्काम आज इथं तर उद्या तिथं.
अशाच एका मुक्कामात तमासगीर मंडळींच्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याचा दिवस जवळ येतो. तमाशाची नायिका शेवंता पूजा उरकून परत जातानाच गावच्या इनामदाराची जीप आडवी येते. इनामदारांच्या “शिरत्याप्रमाणे’ शेवंतासारखे गिर्रेबाज पाखरू त्याच्या नजरेत भरते. आपल्यासमोर एक खास कार्यक्रम झाला पाहिजे, अशी आज्ञा इनामदार सोडतात.
इनामदारांच्या वाड्यावर छोट्यासा कार्यक्रम उरकून शेवंताची पार्टी रातोरात गाव सोडून जाते. इनामदार चरफडत बसतो. वाटेत शेवंता आणि कंपनीला एक कविराज भेटतात. ते वगनाट्य लिहितात. त्याचे हाउसफुल्ल कार्यक्रम चालू असतात. असाच एक हाउसफुल्ल कार्यक्रम चालू असताना वगात विष्णूची व नारदाची भूमिका करणारे दोन नट पडद्यामागे चिलमीचा दम मारीत बसतात.
त्याच धुंदीत ते तमाशाच्या कनातीतून बाहेर पडतात. धुंद व बेभान झालेली ही जोडगोळी गावात हिंडते. लोकही त्यांना “भगवान’ मानतात. एकंदरीत ही जोडगोळी प्रेक्षकांना चांगला रिलीफ देते. ही जोडी अभिनयाच कसब दाखवितात. ही जोडगोळी वगातून निघून गेल्यामुळे शेवंता अतिशय दुःखी होते. यांचा शोध सुरू होतो आणि शेवटी अनेक संकटांना तोंड देत या जोडीची पुन्हा शेवंता कंपनीशी भेट होते.
खरे तर चित्रपट इथंच संपावयास हवा होता. पण शेवटी शेवंताने आपल्या मंडळीबरोबर खेडेगावी कुटुंब नियोजनाचा प्रसार करणे व यामध्ये “त्या’ इनामदाराला धडा शिकविणे हा भाग लांबण लावण्यासारखा वाटतो.