टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यामध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे. फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारात 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा अनुभवी कुस्तीपटू रवीकुमार दहीया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 5-9 अशा पिछाडीवर असताना चित्त्याची चपळाई दाखवत त्याने सलग पाच गुण मिळवत त्याने चमत्कार घडवला आणि सुवर्ण पदकासाठी पात्र ठरला.
उपांत्य फेरीत झालेल्या लढतीत त्याने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केला. त्यामुळे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील चौथे पदकही निश्चित झाले आहे. सामना सुरु झाल्यावर 5-9 असा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारने नंतर मात्र धडाक्यात पुनरागमन करताना सलग तीन गुण मिळवले व थाटात अंतिम फेरी गाठली. त्यानंतरही दहीयाने सलग पाच गुणांची कमाई केली.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून पदक पटकावणारा दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक मिळवले आहे. बुधवारच्या या सामन्यात दहीयाने रजतपदक निश्चित केले असून त्याला चमत्कार घडवत सुवर्णपदक पटकावण्याचीही संधी आहे.
फ्रीस्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश करणारा दहीया केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सुशील कुमारने 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. बल्गेरियाच्या खेळाडूचा पराभव करून त्याने उपांत्य फेरी गाठली होती. दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा 14-4 असा पराभव केला.