लंडन- विविध कारणांनी तयार होणाऱ्या ई कचऱ्याचा वापर करून त्याच्या माध्यमातून सोने आणि चांदी हे मौल्यवान धातू उत्पादन करण्याचा प्रकल्प रॉयल मिंट या सरकारी कंपनीने सुरू केला आहे. खराब झालेले स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर या कचऱ्याला ई-वेस्ट असे
म्हणतात त्याच्यावर प्रक्रिया करून सोने आणि चांदी या धातूंचे उत्पादन करण्याचा हा प्रकल्प आहे.
कॅनडामधील एकसिर नावाची कंपनी या प्रकल्पामध्ये रॉयल मिंट कंपनीला सहकार्य करणार आहे या दोन कंपन्यांनी मिळून केलेल्या चाचणीला यश मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला असून आता नजीकच्या काळात आणखी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या कचऱ्यातील 99% धातू बाजूला करणे शक्य होणार आहे.
जगात दरवर्षी पाच कोटी टन एवढा ई कचरा तयार होतो. त्यापैकी फक्त 20 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तज्ञांचे म्हणणे असे आहे की जगात उपलब्ध असलेल्या सोन्यापैकी तब्बल सात टक्के सोने या ई कचऱ्यामध्ये असते. या कचऱ्यावर प्रक्रिया केली नाही तर हे सोने वायाच जाते. रॉयल मिंट आणि एकसिर कंपनीने केलेल्या प्रयोगात सायबर कचऱ्यातून तब्बल 99.99% सोने बाजूला काढण्यात यश आले आहे.
दोन्ही कंपन्यांनी मिळून ई कचऱ्याचे रिसायकलिंग करण्याची सोपी पद्धत शोधली आहे. ई कचऱ्यावर प्रक्रिया करणेही सोपे होणार आहे. संपूर्ण पर्यावरण पूरक अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने त्याची पर्यावरणालाही कोणतीही हानी होणार नसल्याचे रॉयल मिंट कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.