मुंबई – जुलै -सप्टेंबर या तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 139 टन इतकी नोंदली गेली आहे. यामुळे सोन्याची मागणी करोना पूर्व पातळीवर आली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.
लोकांचे अर्थार्जन वाढत असल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी जुलै- सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी केवळ 94 टनाची होती. जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, व्यापार- व्यवसाय वाढत आहेत. त्याचबरोबर लसीकरणामुळे ग्राहक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील करोनाविषयक भीती आता कमी झाली आहे.
प्रत्यक्ष सोने खरेदी बरोबरच डिजिटल माध्यमातून सोने खरेदी वाढू लागली आहे. आगामी काळामध्ये या माध्यमातून सोने विकत घेण्याचे आणि बाळगण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर महागाई वाढत आहे. त्याचबरोबर भारतातही आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याची मागणी वाढत असते. त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल असा आमचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळामध्ये सोन्याच्या किमतीही कमी पातळीवर असल्यामुळे भारतामध्ये सोन्याची खरेदी वाढू शकते असे त्यांनी सांगितले.