नवी दिल्ली – सोन्याचे दर उच्च पातळीवर असल्याने भारतात सोने खरेदी कमी झाल्यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत सोन्याची आयात तब्बल 81 टक्क्यांनी कमी झाली. या कालावधीत भारतात केवळ 2.47 अब्ज डॉलरच्या म्हणजे 18 हजार 590 कोटी रुपयांच्या सोन्याची आयात झाली आहे.
गेल्या वर्षी या काळात 13.16 अब्ज डॉलरची म्हणजे 91 हजार 440 कोटी रुपयांच्या सोन्याची आयात झाली होती. तयार चांदीची आयात या कालावधीत 56.5 टक्क्यांनी कमी होऊन 685 दशलक्ष डॉलर म्हणजे 5 हजार 185 कोटी रुपयांची झाली आहे. या दोन धातूंची आयात कमी झाल्यामुळे भारताची व्यापारातील तूट केवळ 14 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत भारताची व्यापारातील तूट 59 अब्ज डॉलर इतकी होती.
डिसेंबरपासून भारतात होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर परिणाम झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक खरेदी टाळणे सुरू केले आहे. आता सोन्याची खरेदी पूर्वपदावर येण्यास बराच काळ लागणार आहे. मात्र, तरीही उत्सवांच्या काळात थोडीफार खरेदी होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.