अहो, सोनं सापडलंय सोनं… गोल्ड! या महाराष्ट्राच्या भूमीत. साधंसुधं नाही, सोन्याच्या खाणी सापडल्यात. चंद्रपूर जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी भागातल्या खाणींमध्ये सोन्याचे ब्लॉक सापडलेत. म्हणजे, महाराष्ट्राला एकदम श्रीमंत होण्याची संधी… अचानक धनलाभ… लॉटरी… इत्यादी वगैरे..! पण महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या घटनेचा आनंद साजरा करता येईना.
खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही गुडन्यूज उत्साहात दिली; पण त्यावर अपेक्षित आनंद व्यक्तच झाला नाही. आपल्या देशात करप्रणाली बदलली म्हणून काही वर्षांपूर्वी रात्री बारा वाजता लायटिंग वगैरे करून उत्सव साजरा केला गेला; पण महाराष्ट्रदेशी चक्क सोन्याच्या खाणी सापडूनसुद्धा उत्सव साजरा झालाच नाही. मुख्यमंत्री एवढंही म्हणाले की, “आमच्या कार्यकाळात’ खाणीतून सोनं निघालं तर ते मोठं यश असेल; पण तरीसुद्धा कुणीच टाळ्या वाजवल्या नाहीत राव! खरं तर फटाके वाजवायला हवे होते. ढोलताशे वाजवायला हवे होते. जिथं कोळसा सापडतो तिथं आता तांबं आणि सोनं सापडणार आहे.
या परिसरात सोन्याबरोबरच प्लॅटिनम, रुथेनियम, रेडियम, इरेडियम वगैरे अतिदुर्मिळ धातूही सापडू शकतात; पण हे संशोधन दहा वर्षांपूर्वीचं आहे म्हणे! म्हणजे, सुरुवात कधी झाली? प्रस्ताव कधी दाखल झाला? अहवाल कधी आला? संशोधनाचे आदेश कधी निघाले? आणि मुख्य म्हणजे ते कुणाच्या सहीनं निघाले? हे प्रश्न निघतील म्हणून सेलिब्रेशन टाळलं का, हेही बघितलं पाहिजे!
अर्थात, याला आणखीही एक कारण असण्याची दाट शक्यता आहे. खरंतर कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीचा इव्हेन्ट करण्याच्या आजच्या काळात सोन्याच्या खाणीसारखी गोष्ट “अनसेलिब्रेटेड’ राहूच शकत नाही. पण “हिऱ्याच्या खाणीं’मुळं सोन्याची झळाळी कमी झाली की काय, याचाही अंदाज घ्यावा लागेल. या हिऱ्यांनी रोज उठून वेगळ्याच इतिहासाचं “खनिकर्म’ सुरू केल्यामुळं बिचारं सोनंही चमकेना. या खाणीतून काल असा इतिहास बाहेर निघाला, जो ऐकून रायरेश्वरही आचंबित झाला असेल. कारण छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ रायगडावर घेतली होती, असं वक्तव्य केलं गेलं.
मुळात शिवरायांचं जन्मस्थान कोकणात असल्याचा शोध अचानक लागल्यामुळं अनेक इतिहासकारांना धक्का बसला. त्याहून मोठा धक्का बसला तो “दिलगिरी’ ऐकून. कारण पहिलं वाक्य निषेधाचं! या विषयावरून राजकारण करणाऱ्यांचा निषेध! “”तरीसुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर…” हे शेवटचं वाक्य! इतिहासाचं जे काही सध्या चाललंय, त्याहून भयंकर आहे ही सारवासारव. जणू आपली काही चूक झालीच नाही, अशा थाटात काहीजण वावरतायत तर काहीजण चक्क गप्पच राहतायत. इथे प्रश्न व्यक्तीचा नाही. प्रश्न आहे इथे आकाराला येत चाललेल्या “झुकेगा नही’ संस्कृतीचा! महापुरुषांच्या सन्मानापेक्षाही महत्त्वाच्या ठरत चाललेल्या “पक्षीय इगो’चा!
असो, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला आज सोनेरी किनार लाभलीये. कुणी महाराष्ट्राचे उद्योग पळवले तरी महाराष्ट्राचं नशीब पळवू शकणार नाही, हे निसर्गानं दाखवून दिलंय. खरंतर शिवरायांनी आपल्याला याहून कितीतरी मौल्यवान “सोनं’ दिलंय. चपखल योजना आणि तिची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांचं सूत्र आधुनिक व्यवस्थापनशास्त्रातही शिकवलं जातं. हे तंत्र जरी आपण आत्मसात केलं तरी खापर फोडायला डोकी शोधावी लागणार नाहीत. उद्योग गेले; आता सोनं तरी जपूया!