मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा शुभमुहूर्त टळला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला.
सध्या लॉकडाऊनमुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने किंवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदी शक्य आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीचा दरही वाढत आहे.
गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. त्यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा 49 हजार इतका होता.
HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, कॉमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) मधील रिकव्हरीमुळे दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 146 रुपयांनी वधारले. भारतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.