सेल्फी प्रसिद्धीसाठी होतेय स्टंटबाजी; सुरक्षिततेच्या उपायांची गरज
कर्जत – सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे उन्हापासून सुटका करण्यासाठी शाळेतील मुले पोहण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र कोणत्याही सुरक्षिततेशिवाय मुले विहीर, बंधारे, नाले, तलाव अशा ठिकाणी पोहताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांकडून सुरक्षितता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करतानाच्या हव्यासापोटी मुले विविध स्टंट करताना दिसत आहे. अशा स्टंटबाजीतून दरवर्षी कित्येक बालकांना जीवाला मुकतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
उन्हाळा सुरू होताच वातावरणात बदल झाला. सध्या दिवसा आणि रात्री हवामानात मोठी उष्णता जाणवत आहे. जमिनीतील पाणीसाठे कमी झाले आहेत. दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने प्रवाशी प्रवास करणे टाळत आहेत. शेतात काम करणारे शेतकरी तसेच महिलाही शर्ट, टोपी घालूनच शेतात काम करीत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी जनावरे झाडांच्या सावलीचा आश्रय घेत आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लहान मुले पोहण्याच्या मोहापोटी खोल पाण्यात उतरून धोका संभवू शकतो. सुट्ट्या लागल्याने शाळकरी मुले मोकळ्या वेळेत पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पालकांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.