नगर – नगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने गोदावरी, प्रवरा, भीमा, मुळा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. गोदावरीची 53 हजार 895, प्रवरा 1 हजार 423, भीमा 39 हजार 169 तर मुळा नदी पात्रात 2 हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी मध्यरात्री पर्यंत गोदावरी पात्रात 12 हजार 620 व प्रवरेत 2 हजार 338 पाण्याचा विसर्ग होता. त्यात आज सकाळी दहा वाजता वाढ करण्यात आली. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत 53 हजार 895, भीमा नदीत दौंड पुल येथे 39 हजार 169, घोड धरणातून 6 हजार, भंडारदरा धरणातून 1 हजार 423, निळवंडेतून 3 हजार 152, मुळा धरणातून 2 हजार व ओझर बंधाऱ्यातून 6 हजार 301 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास नदीपात्रात आणखीन विसर्ग वाढविण्यात येणार आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यात वाढ झाल्यास प्रवरा, भीमा, गोदावरी, घोड, कुकडी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मागील महिन्यात कोपरगाव तालुक्यात पूराचा मोठा तोटा नागरिकांना सहन करावा लागला.