मुंबई – राज्यात सध्या मोठ्या मंदिरं, प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जागोजागी आंदोलन कऱण्यात येत आहेत. करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केली नाही. यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालायाचा आज शतकपूर्ती सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात रूग्णालयाने केलेल्या कामासह डॉक्टर्स व समस्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कौतुक केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, लॉकडाउनची सुरूवात झाल्यापासून मंदिरं बंद आहेत. प्रार्थनास्थळं बंद आहेत. मग देव आहे कुठे ? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रुपाने आपल्या सोबत, आपला जीव वाचवण्यासाठी आलेला आहे. हा खरा देव आहे, जो आपला जीव वाचवतो. हे रूग्णालय देखील एखाद्या मंदिरासारखं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
जसं व्यथा घेऊन कुणी मंदिरात जातं, तसं कधीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन, अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेकजण व्यवस्थित होऊन, हसतखेळत घरी जातात. हे तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो, असंही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.