नाशिक- करोना आणि लॉकडाऊनच्या फटक्याने नागरिक घराबाहेर निघत नाहीत. त्यामुळे सर्वच बाबी ऑनलाइन झाल्या आहेत. शाळा, व्यवसाय, कार्यालयांचे कामकाज ऑनलाइन सुरू झाले आहे. मग यातून भक्तीभाव कसा मागे राहील? पूर्वी एकत्र येत भजनांच्या माध्यमातून देवाचे नामस्मरण करणाऱ्यांचीही लॉकडाऊनमुळे पंचाईत झाली. पण, यातून या भाविकांनी मार्ग काढत चक्क ऑनलाइन एकत्र येत भजन, कीर्तनाचा सोहळा भरवला आहे.
दि. 1 जुलै रोजी आषाढी एकादशी होती. पण, यावेळी विठुरायाच्या मंदिरात एकत्र येता येणार नाही, त्यामुळे नामस्मरण कसे करायचे? याची चिंता नाशिक येथील सुरेखा शरद केंगे आणि त्यांच्या शांभवी भजनी मंडळाला सतावत होती. त्यावर त्यांनी कॉम्प्यूटर, लॅपटॉप, मोबाइल अशा साधनांची जुळवाजुळव केली. यानंतर सर्वांनी एकत्र येत विठुनामाचा गजर केला.
याला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय विठुनामाच्या गजरात अगदी तल्लीन झाल्याचे दिसून आले. एकूणच काय तर भक्तीभाव असेल, तर कोणत्याही संकटातून आपण मार्ग काढू शकतो, हेच यातून सिद्ध झाले.