उंडाळे -नांदगाव ता. कराड येथे बिबट्याने जनावरांच्या शेडवर हल्ला केला. यामध्ये शेडमध्ये बांधलेले शेळी व बोकड बिबट्याने ठार केले. बुधवारी दि. 6 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने नांदगावसह कालवडे, मनव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदगावमधील हनुमान मंदिर परिसरात ज्योतीराम महादेव साळुंखे यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये त्यांनी शेळीपालन केले आहे. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर हल्ला. यावेळी झालेल्या आवाजाने ज्योतीराम साळुंखे यांनी शेडकडे धाव घेतली. यावेळी बिबट्या शेळी व बोकडावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनतर बिबट्यारच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाले. त्यानंतर साळुंखे यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी बिबट्यावर दगडाचा मारा केल्यानंतर तो निघून गेला.
मात्र, रात्री 2 वाजता बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या साळुंखे यांच्या घरा शेजारील गोठ्यात असणाऱ्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासुन नांदगाव, मनव, उंडाळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचे हल्लेही वाढत असल्यामुळे वनविभागाने तात्काळ बिट्याचा बंदोस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान, याबाबतच माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करू पंचनामा केला. या घटनेत ज्योतीराम साळुंखे यांचे सुमारे 20 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.