बडोदा – भोज सानिया हा सहाव्या पिढीतील मेंढपाळ इतके दिवस त्याच्या शेळ्यांचे दूध एकतर चहाची टपरी चालवणाऱ्यांना किंवा फार तर स्थानिक पातळीवर मावा किंवा तूप बनवणाऱ्या स्थानिक डेअरीला विकत होता. तिथून फार तर त्याला लिटरमागे 15 रुपये भाव मिळायचा. सानियाकडे शंभर बोकड आणि 200 शेळ्यांचा कळप आहे.
सानिया हा मालधारी नामक आदिवासी जातीतील आहे. आता मोठे व्यावसायिक दूध ब्रॅंड त्याच्यापर्यंत पोचल्याने त्याच्या शेळ्यांच्या दुधाला लिटरमागे 35 रुपये भाव मिळू लागला आहे. या दुधापासून या कंपन्या फ्रोजन मिल्क, मिल्क पावडर आणि अगदी शेळीच्या दुधापासून साबण बनवू लागले आहेत. या सगळ्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे.
बडोद्याजवळील जामजोधपूर तालुक्यातील सुमारे 24 खेड्यांमध्ये मालधारी आदिवासींच्या वस्त्या आहेत. सगळ्यांकडे मिळून या तालुक्यात सुमारे 36,000 शेळ्या-बोकड आहेत. आता दूध कंपन्या नियमितपणे शेळ्यांचे दूध संकलन करू लागल्याने मालधारी आदिवासींना अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे, असे भोज सानिया यांनी सांगितले. ते जामजोधपूर तालुक्यातील शेठवाडेला गावचे रहिवासी आहेत.
बापूजींमुळे शेळीच्या दुधाला लोकप्रियता
गाईचे किंवा म्हशीचे दूध पिण्याऐवजी शेळीचे दूध पिण्याची शपथ महात्मा गांधींनी घेतली तेव्हा सगळ्या जगाचे लक्ष शेळीच्या दुधाकडे गेले. गांधीजींना नियमितपणे शेळीचे दूध मिळेल अशी व्यवस्था त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि गांधींजींच्या शिष्यांनी केली होती. जेव्हा गांधीजी इंग्लंडला गेले होते तेव्हाही बरोबर दोन शेळ्या घेऊन गेले होते.
असे आहेत शेळीच्या दुधाचे फायदे
पचायला हलके
अँलर्जी रोखण्यात मदतकारक
आजारातून लवकर बरे होण्यासाठी उपयुक्त
त्वचेला चांगले
शेळीच्या दुधात उच्च प्रतीचे प्रोटीन असते.
अन्य प्राण्यांच्या दुधाच्या तुलनेत शेळीच्या दुधात फॅट कमी असते.