पाटणच्या साईकडेत नववधू करोनाबाधित
करवल्यांसह वऱ्हाडी मंडळीत भीतीचे वातावरण
31 जणांना केले क्वारंटाइन
अंकुश महाडीक
सणबूर – साईकडे, ता.पाटण येथे चार दिवसांपूर्वी विवाह पार पडलेली नववधू करोनाबाधित सापडल्याने विवाहात मिरवणाऱ्या करवल्यांसह दोन्ही गावच्या वऱ्हाडी मंडळींची झोप उडाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तर डोंगरपठारावर असलेल्या निगडे आणि महिंद या दोन्ही गावात करोनाचा शिरकाव झाल्याने ढेबेवाडी विभागातील जनतेचे धाबे दणाणले आहेत. बहुतेक बाधितांचे मुंबई कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाल्याने आता गावागावात नव्याने येणाऱ्या मुंबईकरांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चोरी चोरी छुपके छुपके मुंबई, पुण्याहून गावाकडे येणाऱ्यांची संख्या ढेबेवाडी तळमावले विभागात झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत विभागातील बनपूरी, शितपवाडी, भालेकरवाडी, कसणी, निगडे, कुंभारगांव, शेजवळवाडी, काजारवाडी, बागलवाडी, गलमेवाडी, शेंडेवाडी, धामणी, वाझोली, भरेवाडी आदी गावांतील सुमारे साठवर करोनाबाधित रुग्ण सापडले. यापैकी कुंभारगाव, शितपवाडी, शेजवळवाडी, बनपूरी येथील चौघांचा करोनाने बळी घेतला. आतापर्यंत विभागात बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई कनेक्शन असलेल्या रुग्णांची सर्वाधिक नोंद आहे.
चार दिवसांपूर्वी साईकडे येथे विवाह सोहळा पार पडला. यावेळी जावली तालुक्यातील वधू तर साईकडे येथील मुलगा होता. ही दोन्ही कुटुंबे मुंबईस्थित आहेत. ज्या दिवशी विवाह पार पडला, त्याच दिवशी रात्री उशिरा नववधूच्या नातेवाईकाचा करोनाने मृत्यू झाला. त्याची माहिती मिळताच येथील आरोग्य विभागाने नवदाम्पत्यांसह तेरा नातेवाईकांना शासकीय विलगीकरण कक्षात दाखल केले. तर विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या इतर सुमारे चाळीस जणांना होम कॉरंटाइन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे विवाहात मिरवणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसह दोन्ही गावच्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत गावाकडे जाणाऱ्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. तर या विवाह सोहळ्यासाठी जेथून साहित्य, कपडे खरेदी केली त्यांचीही तारांबळ उडाली आहे. त्यामुळे शासनाने विवाह सोहळ्यांसाठी दिलेली लोक मर्यादा कमी करण्याची गजर निर्माण झाली आहे.
मुंबईकरांना आवर कोण घालणार…?
ढेबेवाडी विभागात सापडलेल्या करोना बाधितांमध्ये मुंबई कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही गावागावात मुंबईकरांचा शिरकाव सुरूच आहे. शासनाची दिशाभूल करून चोरट्या मार्गाने येणाऱ्या मंडळींना आवर घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात अशीच स्थिती राहिलीतर विभागातील करोनाचा प्रर्दुभाव रोखणे अवघड होणार आहे.
विवाह सोहळ्यातून करोनाचा प्रवेश…
शितपवाडी, ता.पाटण येथील विवाहानंतर लगेच नवऱ्या मुलाच्या वडिलांना करोनाची लागण झाली. त्यानंतर नवदाम्पत्यांसह इतरही बाधित झाले. यामध्ये नवऱ्यामुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर आता साईकडे येथेही लग्न सोहळ्यातून करोनाने प्रवेश केला आहे. अशा घटना ताजी अजूनही लोकांमध्ये प्रबोधन का होत नाही? हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.