करोनाच्या साथीने प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडवून आणले आहेत. त्यातही तरुण उद्योजकांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे मोठ्या शहरातून गावाकडे किंवा छोट्या शहरांत स्थलांतर. अनेकजण या बदलांना यशस्वीपणे सामोरे गेले. संघर्ष केला. काहीजणांचा संघर्ष चालू आहे. तर काहीनां यश दिसत आहे.
असाच एक तरुण म्हणजे अय्याज रशीद. 28 वर्षांचा अय्याज मुंबईत प्रॉडक्ट डिझाईनर म्हणून काम करत होता. तो मूळचा केरळमधील त्रिसूरचा. त्याचे आईवडील तिथे असतात. लॉकडाऊन संपेपर्यंत त्रिसूरला राहायचे असे ठरवून तो तिकडे गेला. पण तिथे काम करता करता त्याच्या असे लक्षात आले की, दीर्घकाळाचा विचार करता कामसाठी त्रिसूर शहर चांगले आहे.
आईवडील रहात असलेल्या इमारतीतच त्याने छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आणि काम सुरु केले. नव्या ठिकाणाहून काम करण्याचे फायदे त्याला कळू लागले. मुंबईत राहायचे म्हणजे निम्मा वेळ आणि पगार खर्च व्हायचा. आता प्रवासात वेळ जात नाही. आईवडिलांसोबत राहण्याचे समाधान आणि आनंद मिळतो. पैसा आणि वेळ वाचतो.
जानेवारी महिन्यातच त्याने नोकरी सोडून कॉलेजमधील सहा मित्रांसोबत नॉन झीरो हे डिझाईन स्टार्ट अप सुरु केल होते. आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पांगले आहेत. तिघे मुंबईत, एक दिल्लीत अशी पांगापांग झाली आहे. सगळेजण दूर अंतरावरून सहकार्याने काम करतात. अय्याज म्हणतो, आता कुठूनही कंपनी चालवता येते. मीटींग्जसाठी आम्ही व्हर्च्युअल फ्लॅटफॉर्मवर एकत्र येतो.
अय्याज मोठ्या शहरातून बाहेर पडत होता. त्याचवेळी श्रुती गोतारकर आणि त्यांचे पती गौरवसिंग मुंबई सोडून कोकणातील माणगाव या छोट्या शहरात स्थलांतरित झाले. त्यांची छोटा पकोडा नावाने पाळीव प्राण्यांसाठी फर्निचर बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी तर व्यवसायाचा सगळा पसाराच हलवण्याचा निर्णय घेतला.
गोतारकर यांच्या कुटुंबियांची माणगावजवळील एका खेड्यात शेतजमिन आहे. हे दोघे ग्रामीण जीवनाची चव चाखण्यासाठी तिथे दाखल झाले. असे काही करण्याचा त्यांचा विचार चालू होता मात्र लॉकडाऊनचा त्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला. मुंबईतील भाडे आणि कामगारांचे पगार देणे परवडत नव्हते. श्रुती या कोझिकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थीनी आहेत. आता बचतीच्या पैशातून व्यवसाय वाढवण्याची त्यांची क्षमता आहे.
करोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोक मोठ्या शहरांकडून छोट्या शहरांकडे जात आहेत. कुठुनही व्यवसाय करता येत असल्यामुळे तरुण व्यावसायिक परवडणाऱ्या शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मध्यम आणि छोट्या शहरांमध्ये घरे भाड्याने घेण्याची मागणी वाढली आहे.
अय्याज काय किंवा गोतारकर काय, त्यांना व्यवसायासाठी अमुक एकच ठिकाण असण्याची गरज नाही. छोटा पकोडा या त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांचे बहुतांश मार्केटिंग सोशल मिडिया आणि विशेषतः इन्स्टाग्रामद्वारे होते. मात्र मुंबईहून कच्चा माल मागवणे आणि उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवणे जितके मोठ्या शहरात सोपे असते तितके छोट्या शहरात सहज नसते ही गोष्ट मान्य करावी लागेल.