नवी मुंबई – अयोध्येला नक्की जा. म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिला. हा विचार शिवसेना विसरली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
नवी मुंबईत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
नड्डांनी दिला स्वबळाचा नारा
नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व अशा होणार असल्याचे नड्डांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील चित्र तुम्हाला पालटायचे आहे. एक गंभीर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करावे लागेल.”ऑल व्हर्सेस वन-भाजप’ अशी तयारी तुम्हाला करायची आहे. आपल्याला एकट्याने विजयश्री मिळवायचा आहे. कोणी भाजपला थांबवू शकणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो, असे नड्डा म्हणाले. दरम्यान, जे पी नड्डा यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेसोबत पुनर्मिलनाच्या आशा मावळल्या आहेत. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर दिसत आहे.
फडणवीस म्हणाले, या देशातील काही पक्ष असे आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी हे काहीही करायला तयार आहेत. मध्यंतरी शरद पवार यांनी एक विधान केले होते की, सीएएचा भटक्या-विमुक्तांना त्रास होणार आहे. त्यामुळे मी विरोधकांना चॅलेंज करतो की, सीएएमुळे भटक्या-विमुक्तांना कुठला त्रास होणार हे त्यांनी दाखवून द्यावंच, जर तुम्हाला तर ते सिद्ध करता येणार नसेल तर तुम्ही मोदींची माफी मागावी, असे ते म्हणाले.
नागरिकता संशोधन विधेयकाच्या आवश्यकतेबाबत पंडीत जवाहरलाल नेहरु, कम्युनिस्ट पक्ष, लालबहादूर शास्त्री यांनीही मागणी केली होती. मात्र, आता त्या कायद्याविरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे. नेहरुंनी लियाकत यांच्यासोबत जो करार केला होता त्यात त्यांनी मान्य केले होत की, पाकिस्तानातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन लोकांवर अत्याचार झाला तर भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिलें. मग मोदींनी हा कायदा आणून काय चूक केली? हा नागरिकता घेणार नाही तर देणारा कायदा आहे. मात्र, याविरोधात सोशल मीडियातून खोटा प्रचार सुरु आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.