चिखली – भोसरी विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी, चिखली, कुदळवाडी यासह अनेक भागात महापालिकेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पाण्याचे राजकारण होऊ लागले आहे. अनेक भागात पाणी कमी-अधिक प्रमाणात सोडून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्यातही राजकारण करून मतदारांना महापालिकेच्याच टॅंकरचे पाणी देऊन “लोकनायक’ बनण्याचा प्रयत्न काही “जनसेवक’ पदाधिकारी करू लागले आहेत.
टॅंकरचा गोरखधंदा जोरात
भोसरी विधानसभा मतदारसंघात एका प्रभागात दररोज चार ते पाच पाण्याचे टॅंकर भरून पाठविले जात आहेत. साधारणपणे वापरायच्या पाण्याचा टॅंकर 500 रुपये आणि पिण्याच्या पाण्याचा टॅंकर एक हजार रुपये दराने दिला जात आहे. रोजचे दीड हजार रुपये खर्च पकडला तर एका प्रभागात चार टॅंकरचे सुमारे 6 हजार रुपये होतात. एका महिन्याचे तब्बल 1 लाख 80 हजार रुपये होत आहेत. सामाविष्ठ गावासह अनेक भागात बांधकाम साईट सुरू आहेत. त्या बांधकामांना देखील महापालिकेचे पाणी वापरले जात आहे. राजकीय लागेबांधे असल्यामुळे याविरोधात कोण आवाज उठविणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
मनसेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष राहुल जाधव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देत या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने सर्वत्र सम प्रमाणात पाणी सोडावे, पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरु नये, पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्याच्यावर कारवाईची मागणी जाधव यांनी केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यावर दुष्काळाचे अस्मानी संकट ओढावले आहे. सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. पिंपरी महापालिकेने दिवसाआड पाणी कपात सुरू केली आहे.
अनेक प्रभागात पाण्याचे राजकारण सुरु आहे. कमी – अधिक पाणी सोडून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात पाणी प्रश्नासह विकास कामे करता आली नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टॅंकर पुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्वत्र धावू लागले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना मतदार संघातील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागात पाणी पुरवठा हा आठवड्यातून एक-दोन वेळा अर्धा व्हॉल्व सोडण्यात येतो. पाणी पुरवठा कमी झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होतो. पाणी कमी आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढतात. लोक नगरसेवकांकडे गाऱ्हाणे मांडायला जातात. त्यानंतर नगरसेवक हे अधिकाऱ्यांना फोन करुन पाण्याची विचारणा करतात. नागरिकांचे समाधान करुन उद्या पाणी सुरळीत येईल, आता तुमच्याकडे टॅंकर पाठवून देतो, असे सांगून त्यांना शांत केले जात असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
मतदारांच्या सहानुभूतीसाठी खटाटोप
अनेकदा पाण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होवून त्याचा वाद विकोपाला जातो. काही लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते काय घडले, यावर लक्ष ठेऊन असतात. नागरिक रस्त्यावर उतरले म्हटल्यावर कार्यकर्ते नेत्याला फोन करतात. लोकप्रतिनिधी दोन-चार बगलबच्चे घेऊन भांडण मिटवण्यास येतात. त्यातील एक कार्यकर्ता हळूच फोटो काढून प्रभागातील पाणी प्रश्न सोडवताना दादा, भाऊ, काका अशा उपाध्या सोशल माध्यमातून टाकतात. पाण्यासाठी लोकांना पाण्याचा टॅंकर मागवून भांडू नका, तुम्हाला पाणी कमी पडू देणार नाही, असा विश्वास हे नेते द्यायला विसरत नाहीत. लगेच कार्यकर्ते प्रभागात अफवा पसरवून दादा, भाऊ, काका यांनी स्वःखर्चातून टॅंकर पाठवून दिल्याचे चर्चा घडवून आणली जात आहे. विशेषतः अनेक लोकप्रतिनिधी महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवरून पिण्याचे पाणी टॅंकरमधून मागवितात.