वाशिंग्टन – क्रिप्टो करन्सी जागतिक पातळीवर सामुहिक नियंत्रण होण्याची गरज असल्याचा आग्रह अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक समुदायाला केला आहे. अन्यथा क्रिप्टो करन्सीमुळे हवाला व्यवहार वाढतील, त्याचबरोबर दहशतवादाला पैशाचा पुरवठा होण्याचा धोका वाढेल असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी वॉशिंग्टन येथे आलेल्या सीतारामन यांनी यासंदर्भात नाणेनिधीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, जर क्रिप्टोचे व्यवहार अनियंत्रित पद्धतीने झाले तर विविध देशासमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. क्रिप्टो करन्सीऐवजी विविध देशाच्या रिझर्व बॅंकांनी डिजिटल करन्सी विकसित केल्या तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पैसे वेगात पाठविले जाऊ शकतील.
मात्र यासाठी क्रिप्टो करन्सीचा आधर घेतल्यानंतर कुठल्याच सरकारचे अशा व्यवहारावर नियंत्रण राहणार नाही. कारण तशा प्रकारचे तंत्रज्ञान आती तरी उपलब्ध झालेले नाही. पुन्हा क्रिप्टो करन्सीची अश्या व्यवहाराचा विविध देशावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्याचा छोट्या देशांना अधिक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी क्रिप्टो करन्सीवर सर्व देशांनी मिळून एखादी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे.
अन्यथा कुठल्याही देशाला क्रिप्टो करन्सीवर परिणामकारकरित्या नियंत्रित करता येऊ शकणार नाही. क्रिप्टो करन्सीचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण राखण्यासाठी सर्व देशाच्या सरकार दरम्यान समन्वयाची गरज आहे. अन्यथा विविध देशावर याचा नकारात्मक परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारची भूमिका भारत सरकारने अगोदरच जाहीर केलेली आहे.
मात्र तरीही जागतिक पातळीवर समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काहीही घडलेले नाही. भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्नावर 30 टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यवहारावेळी 1 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात भारतीय रिझर्व बॅंक डिजिटल करन्सी विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.