पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा घेण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. विशेषत: ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास प्राधान्य राहील. मात्र, अन्य पर्याय विचारात घेऊन परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचा निर्णय शुक्रवारी दिला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या नियोजनाची माहिती डॉ. करमळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. न्यायालयाने निर्णय दिला असला तरी विद्यापीठाची परीक्षेची यापूर्वीच तयारी केली.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, परीक्षा घेण्यासंदर्भातील ठराव परीक्षा मंडळाच्या बैठकीत या पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे आता स्वतंत्र ठराव करण्याची गरज नाही. केवळ परीक्षेचे माध्यम आणि वेळ ठरवावी लागेल. चार ते पाच महिने गेल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील.
विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीने ऑनलाइन प्रवेश परीक्षा यशस्वीरित्या घेण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षाही या पद्धतीने होणार आहे.
प्रवेश परीक्षा दिलेल्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षांसाठी ऑनलाइनचा पहिला पर्याय असू शकतो. पण अन्य पर्यायही विचारात घेतले जातील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.