अलिगढ – उत्तरप्रदेश महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी गुरूवारी वादंग निर्माण करणारे वक्तव्य केले. मुलींना मोबाईल फोन देऊ नका आणि दिल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे त्यांनी म्हटले.
महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मीना कुमारी यांनी अजब उत्तर देताना मुलींना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्याचा सल्ला पालकांना दिला. मुली मोबाईल फोनवरून मुलांशी बोलतात आणि नंतर त्यांच्याबरोबर पळून जातात. मुली बहकणार नाहीत याची जबाबदारी समाजाची, कुटूंबांतील सदस्यांची आणि विशेषत: मातांची आहे.
आईने मुलीवर लक्ष ठेवायला हवे. त्याबाबत दुर्लक्ष झाल्यास नकोसे प्रसंग घडतात. मोबाईल फोनचा गैरवापर चुकीच्या घटनांना कारणीभूत ठरतो, असे त्या म्हणाल्या. अलिकडेच भिन्न जातींचे तरूण आणि तरूणी एकमेकांसमवेत पळून गेल्याची तक्रार माझ्याकडे आल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.