पाटणा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या वक्तव्यावरून देशात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, सचिनला देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यावरुन राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी सचिनवर टीका केली.
शिवानंद तिवारी यांनी यावेळी, “त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, परंतु त्यांचं जाहिरातीत काम करणे सुरूच आहे. ते एक मॉडेल आहेत. सचिन तेंडुलकरांसारख्या लोकांना अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले, हा भारतरत्नचा अपमान आहे.”
“आज लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून राजकारण सुरू केलं आहे. मात्र खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट्स किंवा सोशल मीडियाच्या अन्य प्रकारांबद्दल माहिती देखील नाही, असे शिवानंद तिवारी यांनी म्हटले.
दरम्यान, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.” असे ट्विट सचिनने केले होते.