मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारथी संस्थे संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खा. छत्रपती संभाजी राजे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.
या बैठकीत छत्रपती संभाजी राजे यांना तिसऱ्या रांगेत बसवल्यामुळे बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर अजित पवारांनी मध्यस्थी करत गोंधळ थांबविला. मात्र आता राजकीय वर्तुळात सरकारवर टीका करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी राजे समर्थकांनी रस्त्यावर येत निदर्शने केली.
दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे, राजे म्हणतात, “छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घरण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल.
समाजाने जो सारथी चा लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचं छत्रपती घरण्यावर असलेला हा विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करेन, असे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे.