मुंबई – राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याचे संकेत दिले होते. सरकार व राज्यपालांच्या भूमिकेतील विरोधाभासामुळे राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार की घेतल्या जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी परीक्षांबाबतच्या सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत राज्यपालांना टोला लगावला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शरद पवार हे सध्या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या कोंकण दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांना राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतच्या संभ्रमावस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना, “पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केल्यास भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनानं घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे असं होत नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते,” असं वक्तव्य करत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.