नगर -महाविकास आघाडीतील मंत्री, नेत्यांवर ओढून ताणून केसेस करून त्यांना बदनाम केले जात आहे. भाजपकडून हे षडयंत्र चालू आहे. इडी, सीबीआय हे भाजपचे कार्यालय झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये गेलेल्यांची गैरकारभाराकडे दुर्लक्ष केले आहे. त्याची यादीच आम्ही देतो, त्यांची चौकशी करा, असे आव्हान जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष पाटील हे नगरच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पाबाबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नाहक गोवण्यात आले. त्यांच्या जावयाने एमआयडीसीतील प्लॅट खरेदी केला होता. त्यांनी बॅंकमार्फत खरेदीचे पैसे दिले होते. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज त्यांनी फेडले आहे. खडसे यांच्याविरुध्द मॅनी लॉड्रिंगची केस करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कारखान्यांसाठी लोकांनी पैसे दिलेले आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप भाजपकडून केले जात आहेत. ओढून ताढून केसेस करून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना बदनाम करण्याचे भाजपचे हे षडयंत्र असल्याचे आरोप पाटील यांनी केला.
त्याचबरोबर इडीने नोटीसी काढलेले काही जण भाजपमध्ये गेले. त्यांची यादी देतो. त्यांची इडी, सीबीआय चौकशी भाजपने करावी, असे आव्हान पाटील यांनी केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पाटील म्हणाले, देशमुखांवर शंभर कोटी रुपये मागितल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पैसे कुठे दिले आहेत.
केवळ चर्चा व आरोप केले जात आहेत. केवळ संभाषणाच्या रेकार्डवरून त्यांच्याविरुध्द कारवाई झालेली आहे. सीबीआय चौकशीला कोर्टाने मान्यता दिल्याने गृहमंत्रिपदावर राहण्यास योग्य न वाटल्याने देशमुख यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. आमच्यावर किती खोट्या कारवाया केल्या तरी राष्ट्रवादी पक्ष डगमगणार नाही, असे पाटील म्हणाले.
एकत्रित निवडणूक लढविण्यास प्राधान्य : पाटील
<स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाने एकत्रित लढण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राधान्य असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
स्थानिक विचार करून, अभ्यास करून जिल्ह्यानिहाय त्याबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुका अद्याप दूर आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका एकत्रितपणे लढण्याची आहे.
इतरांनी वेगळा निर्णय घेतला, तर आमचाही नाइलाज होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणुकीसाठी किती सदस्यांचा प्रभाग राहिल, याबाबत वेगवेगळे विचार होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी चार सदस्यांचा एक प्रभाग रहावा, अशी मागणी होती. तर काही जणांनी दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. आता तो सर्वांना बंधनकारक आहे.