कोपरगाव – कोपरगाव नगरपालिकेच्या पाचव्या साठवण तलावाच्या कामाचे राजकारण करण्यापेक्षा कोपरगावकरांना प्यायला पाणी मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे तलावाचे काम पूर्ण करून पाणी कसे मिळाले यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक स्वप्नील निखाडे यांनी व्यक्त केले.
कोपरगावच्या पाणीप्रश्नावर कायमच माजीमंत्री शंकरराव कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सहकार्य केले. साठवण तलावासाठी येसगावच्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी शंकरराव कोल्हे यांच्या आग्रहास्तव दिल्या. त्यामुळे शहराच्या पाणी योजनेसाठी गोदावरी कालव्या शेजारीच्या जागा उपलब्ध झाल्या. शहरवासियांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी संकटकाळी प्रामुख्याने संजीवनी उद्योग समूह सर्वप्रथम धावून येतो. टॅंकरद्वारे पाणी पुरविणे, शहरात अनेक ठिकाणी असलेल्या बोआरवेल, विद्युत मोटारी बसविणे त्याचबरोबर येसगांव ग्रामपंचायतीच्या तलावातूनही पिण्याचे पाणी पुरविले आहे. तसेच संजीवनी कारखान्यांचे रासायनिक प्रकल्प बंद ठेवूनही शहराची तहान भागविलेली आहे.
यापूर्वी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून साठवण तलावाची क्षमता वाढविलेली आहे. मात्र नगराध्यक्ष काम करण्यापेक्षा फक्त कारणे सांगणे, दुसऱ्याच्या नावाने रडत बसणे, टिकाटिप्पणी, व्हॉट्स ऍप, मोबाईलमध्येच रमलेले दिसतात. नगराध्यक्षांना कामापेक्षा आमदारकीचे डोहाळे लागल्यामुळे शहरविकासाची धूळधाण होत आहे. आ. कोल्हे यांनी विकासाचा आणलेला निधी देखील खर्च होत नाही. सगळे उद्योग करायचे आणि आण्णा हजारे व समाजसेवकांच्या पाठीमागे लपायचे. मांजर डोळे मिटून दूध पीत आहे हे कोपरगाव शहरवासियांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असे निखाडे यांनी म्हटले आहे.