मुंबई – जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मित झालेल्या लसीचा डोस मिळेल अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातही करोना लसीच्या लसीकरणासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्यातील जनतेला मोफत लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास देशात मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाचा कार्यक्रमही राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून भाजपनेते आणि प्रवक्ते राम कदम यांनी ही लस मोफत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मा.श्री. उद्धवजी ठाकरेजी @OfficeofUT @rajeshtope11
राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना साथीच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी कोरोनाची लस मोफत द्यावी .आपण #Corona पैकेज देवू असे म्हणाला होतात निदान #coronavaccination
तरी मोफत द्या pic.twitter.com/dNS6K7GOIS— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 5, 2021
राज्यातील जनतेला करोना पॅकेज देणार असल्याचं तुम्ही म्हटलं होतं. परंतु दिलं काहीच नाही. लोकांना किमान करोना लस तरी मोफत द्या,” असं राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे.
जगभरात पसरलेल्या करोना महासाथीच्या संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे,” असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
राज्यातील जनतेला वेळेत करोना लस मोफत मिळेल अशी मी आशा करतो. याआधी राज्य सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. मात्र राज्य सरकारनं जनहितासाठी आणि निष्ठेनं जनतेची सेवा करावी, अशी माझी अपेक्षा आहे,” असंही कदम यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.