मुंबई : राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जसजशी वाढतेय तसतसं राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी केंद्र 85 टक्के अनुदान देत असल्याचाही दावा भाजपकडून करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालाकंडे चकरा वाढल्या आहेत. आता तर केंद्रातील नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकार परीषद घेत. विरोधी पक्षांच्या प्रश्नाची सडेतोड उत्तरे दिली. यावेळी त्यांनी भापजने केलेले अनेक दावे आणि आरोप फेटाळून लावले.
केंद्राचा दावा आम्ही 85% सबसिडी देतो. या आकड्यांनुसार सध्या तिकीट दर जास्त आहे. केंद्राच्या दाव्यात आणि तिकीट दरात फरक आहे. आमच्या मित्रांनी यावर बोलावे, श्रेय हवं असेल तर ती व्यवस्था चालू आहे का? हे पाहावे, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. केंद्र सरकार रेल्वे तिकीटाचे 85 टक्के खर्च करत आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला आकडेवारी देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले.
मुंबईत पुढच्या 90 दिवसांसाठी सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड महापालिकेने हातात घेतले आहे. अशा रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठवण्याबाबत महापालिका केंद्रीय पद्धत राबवणार असल्याची माहिती पाटली यांनी दिली. उर्वरीत 20 टक्के बेड हे त्या रुग्णालयाकडे राहणार आहेत. गेले तीनचार दिवस मुंबईतील रुग्णांसाठी महापालिकेने एक डॅश बोर्ड तयार केला आहे. त्याच्या ट्रायल झाल्या आहेत. त्यानुसार लवकरच काम सुरू होणार आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड, किती ICU बेड किती हे आता 1916 ला फोन केल्यावर कंट्रोल रुममधून कळणार आहे. तिथे 10 डॉक्टर असणार आहेत. रुग्ण आला की तो कुठे जाणार, बेड कुठे उपलब्ध आहे? याची सर्व माहिती फोनवर मिळणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये रुग्णालयात व्यवस्था मिळेल.