अकोला – गावाच्या विकासासाठी प्राप्त होणारा निधी खर्च करताना रोजगार निर्मितीवर भर द्या. त्यातही भूमिहीन, कोरडवाहू, अल्प भूधारक शेतकरी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिला अशा सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी राजनापूर खिनखीनी येथे दिले. यावेळी गावाचे स्मार्ट व्हिलेज अंतर्गत प्राप्त १० लाख रुपयांच्या प्राप्त निधीचा धनादेश कडू यांच्या हस्ते सरपंच प्रगती रुपेश कडू यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
राजनापुर खिनखीनी येथे कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती रुपेश कडू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर, शाखा अभियंता जी.एम. मसने, उपविभागीय कृषी अधिकारी अ.दे. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी ए. ए. काळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गावातील टंचाई नळ दुरुस्ती मधून चार लक्ष १७ हजार ८१० रुपये, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १८ लक्ष रुपये, व्यायाम शाळेसाठी सात लक्ष रुपये, गावातील अंतर्गत रस्ते गटारी यासाठी १५ लक्ष रुपये, स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी १० लक्ष रुपये, आर ओ प्लांट साठी पाण्याची टाकी १७ लक्ष रुपये, स्मशानभूमीचे कुंपण व सौंदर्यीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच गावातील रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अधिवास प्रमाणपत्र, प्राचीन मंदिरासमोरील विहीर दुरुस्तीकरण व खोलीकरण, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिव्यांग योजना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अतिरिक्त वर्ग घेणे, शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय शिवणकाम याबाबत २० बचत गटांना प्रशिक्षण, गावकऱ्यांचे पीक विमा योजना प्रकरणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, शिवकालीन तलाव दुरुस्ती व अन्य कामे याबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी गावातील वृक्ष लागवडीचा आढावा घेणे, तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रव संदर्भात तक्रारीच्या निराकरणासाठी ५० हेक्टर चे वनक्षेत्र कुंपण बंदिस्त करा, वन हक्क समिती गठीत करून गावकऱ्यांना उत्पादन मिळेल यासाठी योजना तयार करण्याचेही निर्देश कडू यांनी दिले. तसेच गावाच्या ग्रामपंचायतीच्या शाश्वत उत्पन्नासाठी सौर उर्जेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर कडू यांनी गावच्या शाळेची, तसेच शिवकालीन तलावाची पाहणी केली.