वडूज – विकासकामांबरोबर धार्मिक सलोखाही महत्त्वाचा आहे. समाज स्वास्थ्यासाठी मला केवळ एक संधी द्या, असे आवाहन माण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी केले.
कातरखटाव (ता. खटाव) गटातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.
माजी आमदार प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, प्रा. अर्जुनराव खाडे, नंदकुमार मोरे, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, माजी उपसभापती नाना पुजारी, तानाजी बागल, पृथ्वीराज गोडसे, हणमंतराव देशमुख, राजेंद्र माने, अभय देशमुख, विजय काळे, डॉ. राजेंद्र फडतरे, शंकरराव फडतरे, शशिकांत फडतरे, गंगाराम फडतरे, विलास फडतरे, नामदेव फडतरे, हणमंत फडतरे, हिंदुराव फडतरे, विलासराव धुमाळ, शिवाजी साठे, सुभाष फडतरे, तानाजी फडतरे, संजय फडतरे, दिलीप फडतरे, काशिनाथ पवार, कानिफ फडतरे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधीने पाण्याचे गाजर दाखवून गेली दहा वर्षे येथील जनतेला झुलवत आहेत. “दळण कोळव्याचे व गीत पायलीचे’ असे त्यांचे काम आहे. गेल्या दहा वर्षात ते अनेक गावांत पक्के रस्ते करू शकले नाहीत. निवडणूक आली की त्यांना एमआयडीसी आठवते. माझ्यासारखा अभ्यासू लोकप्रतिनिधी असल्यास सहा महिन्यात एमआयडीसीचा प्रश्न निकालात लावेन. विरोधकांच्या झुंडशाहीला बळी न पडता कार्यकत्यांनी शेवटपर्यंत लढाई करावी.
गावागावातील रस्ते, छोटे पूल, समाजमंदिरे मार्गी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू. जात, पात असा भेद न करता सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात येईल. प्रभाकर घार्गे म्हणाले, आपल्या भागाला एकीची परंपरा आहे. हीच एकी लोकांनी या निवडणुकीत दाखवून द्यावी. प्रा. खाडे, प्रा. गोडसे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे यांची भाषणे झाली. आनंदराव फडतरे यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव जाधव यांनी सूत्रसंचालन केले.