राजू शेट्टी यांची राज्याच्या कृषी सचिवांकडे मागणी
कोल्हापूर : राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे संत्रा, सोयाबीन, कापूस, मका, भात, भाजीपाला ( धान), ज्वारी, बाजरी, भुईमुग, उडीद उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकर्यांना तातडीने हेक्टरी 1 लाख रूपयाची मदत घोषित करावी अशी मागणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी, आमदार देवेंद्र भुयार, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.
राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून. संत्रा, सोयाबीन, भात, मका, द्राक्षे, कापूस, बाजरी, ज्वारी, फळबागा, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्रीय पथक मागवून नुकसानीची पाहणी करून हेक्टरी 1 लाख रूपये मदत जाहीर करावी. राज्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून पावसाने हाहाःकार माजवला आहे. मान्सूनच्या पावसाने सांगली , सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे हजारो कोटी रूपयाचे नुकसान झाले.
शेजारच्या कर्नाटक राज्याला केंद्रीय आपदा निधीतून मदतीची घोषणा झाली महाराष्ट्रात केंद्रीय पथकानेही त्याचवेळी पाहणी केली मात्र अद्यापही मदतीची घोषणा केंद्रसरकारकडून झालेली नाही. गेल्या पंधरा दिवसापासून संपुर्ण राज्यात अवकाळी पावसाने झोडपले असून संत्रा, सोयाबीन, भात, मका, द्राक्षे, कापूस, बाजरी, ज्वारी, फळबागा, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाने सातत्य ठेवल्याने रब्बीचा हंगाम पुढे जात असून बॅंका व वित्तीय संस्थाचे पिक कर्जासाठी घेतलेली रक्कम थकीत गेल्यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने शेतकर्यांचे पुढील पिकाचे नियोजन कोलमडले आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना व इतका संकटात असतानादेखील ना केंद्र सरकार अथवा राज्य सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सरकारच्या या भुमिकेबद्दल शेतकर्यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. संतापलेला शेतकरी कायदा हातात घेऊन सरकार विरोधी उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तरी राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून केंद्रीय पथकाकडून पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.