नवी दिल्ली – कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये रामराज्य अवतरल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता, मात्र आज तिथली काय परिस्थिती आहे. गेल्या तीन महिन्यात जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्राचे १४ जवान शहीद झाले. तसेच त्याठिकाणी किती जणांना रोजगार मिळाला? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला. तसेच तिथे शाळा काढायची मला जमीन द्या, आहे का तयारी सरकारची, असा थेट आव्हानही राऊतांनी मोदी सरकारला दिले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावादरम्यान चर्चेत सहभागी होताना संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, राष्ट्रपतींचे भाषण हे सरकारचा आवाज असतो. मात्र, सरकारने जनेताही आवाज ऐकायला शिकले पाहिजे, अशी टीकाही राऊतांनी केली.
पाकिस्तानला हरवू अशा गर्जना आपल्याकडे नेहमीच केल्या जातात, मात्र देशातील जवानांची अवस्था काय आहे. जवानांना आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. सीमेवर छातीचा कोट करून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना दोन महिन्यांपासून पगार नाही. तीन हजार पाचशे रुपयांचा महागाईचा भत्ता नाही, नऊ हजार फूट उंचीवर देशाचे रक्षण करणाऱया जवानांना स्नो बूट नाही. सर्वात आधी जवानांना रेशनभत्ता द्या, जाकीट द्या. विकास, विश्वासाच्या बाता चालत राहतील, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारला सुनावले आहे.
दरम्यान, सियाचिन, डोकलाम आणि लडाख या उंचावरील युद्धक्षेत्रात, बर्फाळ भागात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक कपडे आणि खाद्यपदार्थांसाठी सैनिक दररोज संघर्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे.